पश्चिम रेल्वे आरपीएफ पोलिसांनी घरातून पळून गेलेल्या 718 मुलांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधिन केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीने या 718 मुलांना आसरा मिळालाय. पश्चिम रेल्वे सुरक्षा बल (RPF) च्या राज्य पोलीस, गुप्तहेर संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने ही मोहीम फत्ते केली गेली.मार्च 2018 ते मार्च 2019 पर्यंत घरसोडून गेलेल्या मुलांचा यात समावेश आहे. तसेच या कामगिरीत पश्चिम रेल्वेच्या ‘चाइल्ड हेल्पलाईन’ने महत्वाची भूमिका बजावली आहे. पोलिसांच्या हाती लागलेली ही मुले भावनगर भागातून 25, बडोदामधून 71, मुंबई सेंट्रल परिसरातून 381, अहमदाबादमधून 44, रतलाम मधून 174, राजकोटमधून 23 असे एकूण 718 मुलांना पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाकडे पाठवले आहे.
हक्काचे घर मिळण्यासाठी
‘घर सोडून गेलेली मुले बऱ्याचदा तस्करीला बळी पडतात. त्यात त्यांना भीक मागण्यास प्रवृत्त करणे, चोऱ्या-माऱ्या करायला लावणे यांसारख्या अनेक वाईट गोष्टी त्यांना कराव्या लागलात. त्यात बरीच मुले ही कुठल्या ना कुठल्या रेल्वेस्थानकातच भटकताना आढळतात. अशा ह्या मुलांना त्यांचे हक्काचे घर परत मिळावे म्हणून पश्चिम रेल्वे पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी फत्ते केली आहे’, असे रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सागितले.
या स्थानकांवर चाइल्ड हेल्पलाइन डेस्क सुरू
हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचवण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. तसेच मुलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेनी महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. तर मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, सुरत, बडोदा, अहमदाबाद, रतलाम आणि राजकोट स्थानकांवर ‘चाइल्ड हेल्पलाइन डेस्क’ सुरू करण्यात आले आहेत