नवी दिल्ली – राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी उद्या 23 मे 2019 रोजी फेरी पद्धतीने निकाल जाहीर होणार आहेत. निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी होणार असून राज्यात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 867 उमेदवार उभे आहेत. या निवडणुकीमध्ये राज्यभरात 97 हजार 640 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच राज्यात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारघासंतील 5 व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. या अनुषंगानेही मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पालघरसह या मतदारसंघात 33 निकाल फेऱ्या होणार
पालघर, ठाणे आणि भिवंडी – गोंदिया मतदारसंघात एकूण 33 निवडणूक निकाल फेऱ्या होणार आहेत. तसेच बीड आणि शिरुर मतदारसंघात एकूण 32 निवडणूक निकाल फेऱ्या होतील. अमरावती आणि सांगली मतदारसंघात 18 निवडणूक फेऱ्या होतील.दरम्यान सर्वात कमी म्हणजे 17 निवडणूक निकाल फेऱ्या हातकणंगले मतदारसंघात होतील.
जनतेला असा निकाल पाहता येणार
संकेतस्थळ व टोल फ्री क्रमांकावर निकालाची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहण्यास मिळणार आहे. तसेच 1950 या टोल फ्री क्रमांकावर आणि 24 तास कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षातील 022-22040451 / 54 या क्रमांकावर देखील निवडणूक निकालाची माहिती मिळणार आहे.
मंत्रालयात नियंत्रण कक्षाची स्थापना
मंत्रालयामध्ये माध्यम प्रतिनिधींना निवडणूक निकालाची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा नियंत्रण कक्ष देखील 24 तास कार्यरत राहणार आहे. तसेच मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण, मुख्य गेट, गार्डन गेट आणि मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या डिजिटल होर्डींगवर देखील निकालाची माहिती मिळणार आहे.
वाहतूक विभागाच्या डिजिटल साईन बोर्डवर निकाल
मुंबई शहरात वाहतूक विभागाच्या डिजिटल साईन बोर्डवर देखील निकालाची माहिती देण्यात येणार आहे. धावत्या मुंबईकरांना निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
जिल्हा पातळीवर निकालाची माहिती
जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी हे जनतेला निकालाची फेरीनिहाय माहिती देणार आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांना अद्यावत निकाल कळणार आहे.