वेब टीम – जगभरात आज 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिन साजरा केला गेला. या दिनानिमित्त आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या आजारापासून कसा बचाव करावा, या आजाराची लक्षणे काय याबाबत नागरिकांना माहिती दिली जाते. खर तर मलेरिया हा असा आजार आहे ज्याला दुर्लक्षित केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे खालील दिलेली कोणतेही लक्षणे शरीरात वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
केवळ भारतापुरते बोलायचे झाले तर, एका अहवालानुसार भारतात वर्षाकाटी सुमारे 18 लाख लोकांना मलेरियाचा सामना करावा लागतो. जगभराच्या तुलनेत 80 टक्के घटना भारत, इथियोपिया, पाकिस्तान आणि इंडोनेशिया देशातील असतात असे जागतिक मलेरिया अहवाल सांगतो. तसेच देशात उडीसा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांमध्ये मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात.
लक्षणे
◾ताप हे मलेरियाचे प्रमुख लक्षणं आहे. जर तुमच्या घराच्या परिसराजवळ पाण्याचे डबके असेल तर विशेष काळजी घ्या. ताप आल्यानंतर वेळीच डॉक्टरांकडे जा.
◾मलेरियाच्या रुग्णांना तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो. थंडी-तापासोबत जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता, वेळीच मलेरियाची तपासणी करून घ्या.
◾मलेरियाच्या रुग्णांना, वातावरण गार नसेल तरीही थंडी भरते. अशावेळेस डॉक्टर्स अनेकदा रक्ततपासणीचा सल्ला देतात. त्याद्वारे मलेरियाचे नेमके निदान करता येते.
◾जर तुम्हाला मलेरिया असेल तर रुग्णाला थंडी, हुडहुडी भरण्यासोबतच सतत घाम येण्याचे प्रमाण देखील अधिक असते. म्हणूनच मलेरियामुळे आरोग्याचे नुकसान होण्यापुर्वी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
◾इतर अनेक विकारांप्रमाणेच मलेरियामध्येही उलट्या होणे हे लक्षण प्रामुख्याने आढळून येते. या सर्वसामान्य लक्षणांप्रमाणेच अंगदुखी, खोकला ही लक्षणं आढळतात. म्हणूनच अधिक दिवस ताप अंगावर काढण्यापेक्षा वेळीच योग्य तपासण्यांमधून मलेरियाचे निदान करा.
मलेरियापासून बचाव
◾वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
◾रक्ताची तपासणी घेऊन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे घ्या.
◾मलेरिया हा औषधांनी बरा होणारा आजार आहे. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका.
◾खास करुन ताप आला असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.