वसई विरार महापालिकेचा २७८० कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आयुक्ताकडून सादर
अर्थसंकल्पात ४३३ कोटीची वाढ.

वसई विरार महापिकेचा अर्थसंकल्प सादर
प्रसेनजीत इंगळे | बातमीदार
विरार : वसई विरार महापालिकेचा सन २०२३- २४ चा अर्थसंकल्प मंगळवारी प्रशासक तथा पालिका आयुक्त यांच्याकडून सादर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी ४३३ कोटी रुपयाची भरीव वाढ करत २७८०.८१ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षीसुद्धा पालिकेकडून कोणतीही करवाढ करण्यात आली नसल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यात या वर्षीच्या अर्थसंकल्पात विविध नागरी सुविधांवरील खर्च वाढविण्यात आला असून नागिराकांना अनेक नव्या सुविधा देण्याचा मानस पालिकेने अर्थसंकल्पातून दाखविला आहे.
वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सलग दुसऱ्यांदा प्रशासक म्हणून पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या वर्षी आयुक्तांनी नागरी सुविधांवर भर देत पालिकेच्या खर्चात वाढ केली आहे. यात प्रामुख्याने बांधकाम व्यवस्थाच्या माध्यामातून शहर सौंदर्यीकरण, वाहतूक बेटे, नाट्यगृह, बाजारपेठा उड्डाणपूल, तलाव सुशोभिकरण यावर भर दिला असून मागील वर्षीच्या तूलनेत खर्चात दुप्पट वाढ करत या वर्षी ८१४ कोटी ४४ लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. तर उद्यान व्यवस्थापनाच्या खर्चात १०० टक्के वाढ करत ४ कोटी वरून ४० कोटी ५० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. तर या वर्षी प्रथमच शहरातील तलाव सुशोभीकरणासाठी स्वतंत्र प्रावधान करतर ६० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तर शहरातील खेळाडूंसाठी सुद्धा ६२ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तर नालेसफाई आणि आपत्ती व्यवस्थाप यावरील खर्चात सुद्धा वाढ करण्यात आली असून अग्निशमन विभागाच्या सुविधा वाढविण्यासाठी या वर्षी ११४ कोटी ४५ लाख रुपये पालिकेकडून खर्च केले जाणार आहेत. यात पालिकेच्या वतीने महामार्गावर नवीन अग्निशमन केंद्र बांधली जाणार आहेत.
पालिकेने विद्यूत यंत्रणा वाढविण्यावर सुद्धा भर दिला असून शहारातील ४९ हजार ८५५ पथदिवे बदलून त्या जागी एलएडी आणि सौरउर्जेचे दिवे लावले जाणार आहेत. त्यासाठी ६६ कोटी रुपयाची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. तर आरोग्य सेवा वाढविण्यासाठी पालिकेच्या वतीने १०० टक्क्यापेक्षा अधीक तरतूद करत ११३ कोटी ८२ लाख खर्च केले जाणार आहेत. यात १२ नवीन आरोग्य केंद्र आणि गाव पाड्यात पालिकेच्या वतीने दवाखाने सुरू केले जाणार आहेत. दिव्यांग आणि महिला व बाल कल्याण आणि मागासवर्गीय कल्याणकारी योजनेच्या खर्चातसुध्दा ८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून यांना विविध सेवा सुविधा दिल्या जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पालिकेने कराच्या स्वरूपात कोणतीही वाढ केली नसली तरी पालिकेने उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपारिक उत्पनाच्या स्त्रोतात विशेष बदल करत. मालमत्ता आणि इतर उत्पनाच्या सेवांपासून आपले उत्पन्न वाढविले जाणार आहे. यामुळे या वर्षीचा अर्थसंकल्प नागरिकांना भरगोस सेवा देणारा ठरणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.