महाराष्ट्र राज्यात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूमुळे पहिला मृत्यू झाल्याची नोंद समोर आली आहे. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात करोनामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra: A 64-year-old COVID-19 patient passes away at Mumbai's Kasturba hospital pic.twitter.com/E1X8Dj78n0
— ANI (@ANI) March 17, 2020
देशभरात करोना व्हायरसने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस करोना संशयिताचा आकडा वाढत चालला आहे. आता पर्यत रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली होती. दरम्यान आज सकाळी करोनाची लागण झालेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा कस्तुरबा रुग्णालयात निधन झाले. सदर व्यक्ती घाटकोपरचा रहिवासी असून करोनाची लागण झाली असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
भारतात करोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद कर्नाटकमध्ये झाली. एका ७९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीत राम मनोहर लोहिया रुग्णालयात ६८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
करोनाचा आकडा १२७ वर
देशात करोनाची लागण झालेल्या सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या १२७ वर पोहोचली आहे.