देशाच्या 71 व्या प्रजासत्ताकदिनी देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण 116 जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला 16 लोकांना पदमभूषण आणि जणांना 7 पदमविभूषण अशा एकूण 141 जणांना पुरस्कार जाहिर करण्यात आला होता. यात महाराष्ट्राच्या अहमदनगर या एकाच जिल्ह्यातील दोघा जणांना पद्मश्री परस्काराने सन्मानित करण्यात आले. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीच कार्याध्यक्ष व हिवरे बाजाराचे सरपंच पोपटराव पवार, तसेच बीजमाता म्हणजेच ‘मदर ऑफ सीड्स’ अशी जगभरात ओळख मिळवणाऱ्या राहीबाई पोपेरे या दोघांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
पोपटराव पवारांचा प्रवास
अहमदनगरपासून 16 कि. मी. अंतरावरचं हिवरे बाजार. अंदाजे 1200 लोकवस्तीचं आधुनिकतेची कास पकडून समृद्धीचा मंत्र सांगणारं एक छोटंस हिरवंगार गाव. पूर्वी हत्ती, घोड्यांचा बाजार या गावात भरवला जायचा, म्हणून गावाच्या नावापुढे बाजार शब्द लागला. अस्वच्छता, गावातून होणार स्थलांतर, अपुरा पाऊस यांसारख्या समस्या असताना, शहरात शिकुन गावाकडे परतलेल्या पोपटरावांनी गावाचा कायापालट केला. गावाच्या सरपंचपदी विराजमान होऊन पोपटरावांनी माध्यमिकशाळा, पाणी प्रश्न, स्वच्छता यांसारखे विषय सोडवले. गावाला एकत्र करुन पाण्याचे स्त्रोत वाढवले. शेततळी, झाडांची लागवड यांतून त्यांनी पाणी प्रश्न सोडवला. तर सेंद्रीय शेतीकडे त्यांनी लोकांना वळवले. त्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढले, वर्षाला लोक दोन ते तीन वेळा पीक घेऊ लागली.
गावात 95 टक्के लोक साक्षर आहेत, 100 टक्के दारुबंदी आणि गुटखा बंदी आहे. सौरउर्जचा वापर करुन गावात पथदिवे तसेच सौरदिवे, सौरकंदिल लोकांकडे आहेत. गावातील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जातो. त्यापासून गांडूळ तसेच कंपोस्ट खत तयार करण्यात येते. गावात वैयक्तिक 50, सार्वजनिक 4 ठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मिती होते. गाव पूर्ण हागणदारीमुक्त असून शौचालय गोबरगॅसला जोडून त्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात आला आहे. पोपटरावांनी गावाचा कायापालट केल्याने त्याची दखल घेत गावाला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
• महाराष्ट्र शासनाचा आदर्श गाव पुरस्कार – 1995
• महाराष्ट्र शासनाचा यशवंत ग्राम पुरस्कार – 2000
• भारत सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कार – 2007
• भारत सरकारचा वनग्राम पुरस्कार- 2007
• भारत सरकारचा राष्ट्रीय जल पुरस्कार- 2007
• संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार- 2007
• महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार 2008
• राजमाता जिजाऊ पुरस्कार 2012
राहीबाई पोपेरेंचा प्रवास
कुठलंही औपचारिक शिक्षण न झालेल्या राहीबाई पोपेर यांनी देशी बीयणे गोळा करायला सुरवात केली. जुन ते सोन असे मानणाऱ्या राहिबाईंनी 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या एका आदिवासी महिलेच्या कामाची दखल शासन दरबारी घेण्यात आली. मातीच्या घरावर काही पत्रं टाकून त्यांनी आपली बॅंक उभी केली. त्यात मूल्यवान बियाणं राहीबाईंनी जतन करून ठेवली आहेत. सुरवातीच्या काळात हे काम करताना अनेकांची बोलणी, टीकांचा सामना राहिबांना करावा लागला. ही बाई अस मुर्खासारख काय करते अशी बोलणी देखील त्यांना आईकावी लागली. मात्र तेंव्हा आपण बोलणी आईकली नसती तर आज हा दिवस आला नसता अस राहिबाई सांगतात. हायब्रिट बीयाणांचा वापर आपण करतो, मात्र त्यामुळे आपल्या जीवनमानावर, आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्याएवजी देशी बीयाणे वापरावे असे त्या सांगतात. राहिबाईंनी घराशेजारी जवळपास 4 ते 5 एकरात 400 ते 500 झाडे लावली आहेत.